पुणे : कवयित्री आरती देवगांवकर यांचा ‘अस्तित्वाच्या पाऊलखुणा’ हा कवितासंग्रह १४ डिसेंबर २०१९ रोजी पुण्यात प्रकाशित होत आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे हा कवितासंग्रह प्रकाशित होत असून, सुप्रसिद्ध अभिनेते, कवी, गीतकार जितेंद्र जोशी यांच्या हस्ते या कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे.
लेखिका आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. अनघा लवळेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. ई-बुक स्वरूपातही हा कवितासंग्रह प्रकाशित होणार आहे. प्रकाशन सोहळ्यानंतर कवितांच्या अभिवाचनाचा दृक्श्राव्य कार्यक्रमही होणार आहे.
‘अस्तित्वाच्या पाऊलखुणा’ या कवितासंग्रहातील कविता मुख्यत्वेकरून काही चिंतनपर अनुभव, स्त्रीविषयक संवेदन आणि कविताविषयक धारणा या तीन आशयसूत्रांभोवती गुंफलेल्या आहेत. या सूत्रांमध्ये आत्मशोधाचा समान धागाही आहे. अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी आरती देवगांवकर यांच्या या कवितांचे ‘सत्त्वगुणी कविता’ असे वर्णन केले आहे.
आरती देवगांवकर या लेखक, अनुवादक, फ्री लान्स संपादक आणि मुद्रितशोधक म्हणून पुण्यात कार्यरत आहेत. या क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित संस्थांशी त्या निगडित असून, त्यांनी लिहिलेल्या कथा, कविता अनेक दर्जेदार मासिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘अमरेंद्रकथा’ हे चरित्र त्यांनी लिहिले असून, काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. कवितालेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आरती आणि अरुण देवगांवकर, तसेच ‘बुकगंगा डॉट कॉम’चे संस्थापक मंदार जोगळेकर आणि संचालिका सुप्रिया लिमये यांनी केले आहे.
कार्यक्रमाविषयी :
दिवस आणि वेळ : शनिवार, १४ डिसेंबर २०१९. सायंकाळी चार ते सहा वा.
स्थळ : स्वा. सावरकर स्मारक सभागृह, विमलाबाई गरवारे प्रशालेसमोर, कर्वे रोड, पुणे